
अर्पण अजमिरेला रसायनशास्त्राचे “सुवर्णपदक”
अमरावती विद्यापीठाचा सर्वोच्च सन्मान !
यवतमाळ | समिर शिंदे
कष्ट, जिद्द आणि ज्ञानाची ओढ या त्रिसूत्रीच्या जोरावर आदर्श महाविद्यालय, धामणगाव रेल्वे, जि. अमरावती येथील विद्यार्थी अर्पण निलीमा मिलिंदराव अजमिरे याने अमरावती विद्यापीठात बी.एस्सी. (रसायनशास्त्र) मध्ये सर्वाधिक गुण मिळवत प्रथम मेरिट आल्याने सुवर्णपदक पटकावले आहे. त्याला अमरावती येथे २३ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या ४१ व्या दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
यवतमाळ जिल्ह्यातील फत्तेपुर (ता. बाभुळगाव) या छोट्या गावातून आलेल्या अर्पणने आपल्या जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. सध्या तो पुणे विद्यापीठात एम.एस्सी. (रसायनशास्त्र) करत असून, भविष्यात संशोधन क्षेत्रात मोठे योगदान देण्याचा निर्धार त्याने केला आहे.
यशामागील प्रेरणास्रोत
आपल्या यशाचे श्रेय तो मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक आणि आई-वडिलांच्या पाठिंब्याला देतो. “शिक्षकांनी मला नेहमी योग्य दिशा दाखवली, तर आई-वडिलांनी माझ्या प्रत्येक संघर्षात साथ दिली. त्यांच्यामुळेच मी हे यश मिळवू शकलो.” असे तो म्हणतो,
अर्पणवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव
अर्पणच्या यशाबद्दल कुटुंबीय, शिक्षक, महाविद्यालय, आणि मित्रपरिवाराने अभिनंदनाचा वर्षाव केला असून, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.