
कवी निलेश तुरके यांची दिल्लीच्या साहित्य संमेलनात चमकदार कामगिरी
शेतकरी प्रश्नावर प्रभावी कविता सादर करून श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध
यवतमाळ | समिर शिंदे
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील आटमुर्डी गावातील कवी निलेश दिगांबर तुरके यांनी आपल्या प्रभावी कवितेच्या सादरीकरणातून ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ठसा उमटवला. राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या प्रतिष्ठित संमेलनात त्यांनी शेतकरी प्रश्नावर आधारित कवितेचे दमदार सादरीकरण केले.
“शेतकऱ्याची झाली बघा दैना… लग्नासाठी पोरी कुणी देईना!” या वास्तवदर्शी कवितेतून त्यांनी शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भेडसावणाऱ्या सामाजिक समस्येचे प्रभावी वर्णन केले. सयाजीराव गायकवाड सभागृहात झालेल्या या सादरीकरणाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
या संमेलनाच्या अध्यक्षा प्रसिद्ध लेखिका डॉ. ताराबाई भवाळकर होत्या, तर शरदचंद्रजी पवार स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले.
कवी निलेश तुरके यांच्या या उत्तुंग यशाबद्दल संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. कवी, साहित्यिक आणि मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या प्रभावी सादरीकरणाने त्यांनी यवतमाळ जिल्ह्याचे नाव मोठे करून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.