
दुचाकी झाडावर आदळल्याने युवकाचा मृत्यु
बाभूळगाव। प्रतिनिधी:-
रस्त्याच्या वळणावर दुचाकी अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या दुस-या बाजुला असलेल्या झाडावर आदळून अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील राणी अमरावती गावाजवळ दि. 11 रोजी दुपारी 4.30 वाजताचे सुमारास घडली. यातील मृतक युवकाचे नांव अभिषेक बाबाराव जाधव, वय 26 वर्षे असून तो तालुक्यातीलच यावली येथील रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार, अभिषेक जाधव हा शेती विषयक कामांसाठी दुचाकी क्र. एम.एच.29.ए.झेड.9132 स्प्लेंडर वाहनाने बाभूळगाव बाजारपेठेत आला होता. कामे आटोपून तो यावली या आपल्या गावी जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान राणी अमरावती गावाजवळ असलेल्या तीव्र वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी भरधाव दुचाकी रस्त्याच्या दुस-या कडेला असलेल्या निंबाच्या झाडावर जावून आदळली. या अपघातात अभिषेक याच्या नाजुक जागेवर जबर दुखापत झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. घटनेची माहिती मिळताच राणी अमरावती येथील काही युवकांनी त्याला बाभूळगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. यावली गावात ही वार्ता पसरताच गावावर शोककळा पसरली. अभिषेक जाधव हा गावातील मनमिळावु स्वभावाचा व उत्साही युवक होता.
